Monday 10 April 2017

बखेडाकाका

          एका रविवारी दुपारी खूप दिवसांनी भेटलेल्या एका मित्राकडे सपत्निक जाऊन जेवण्याचा योग आला. मित्राला आणि त्याच्या कुटुंबीयांना अनेक वर्षांनी भेटत होतो. त्यामुळे वेळ मजेत जात होता. वहिनींच्या हाताला चव छान आहे हे जेवल्यावरच कळलं. साधारण दीड दोनच्या सुमारास जेवणं उरकून आम्ही मीठा मसाला पानाचा आस्वाद घेत जुन्या आठवणींना उजाळा देत बसलो होतो. गप्पा छान रंगात आल्या होत्या आणि भर दुपारी भरपेट जेवणानंतर तिथून निघावसं वाटत नव्हतं. वाटलं मित्राने म्हणावं "थांब रे. जरा थोडं आडवं होउन जा. गप्पा मारू. किती दिवसांनी भेटला आहेस. काय गडबड आहे, तसाही आज रविवारच. घरी जाऊन झोपशीलच त्याऐवजी इथेच पड थोडा वेळ". या विचारांची गुंगी चढतच होती इतक्यात मित्राच्या समोरच्या घरातून जोरजोरात भांडणाचा आवाज येऊ लागला. मी आधी बायकोकडे पाहिलं. तिलाही त्या आवाजाची जाणीव झाली होती. तिने हलकेच खांदे उडवले आणि "काही कल्पना नाही" असं सुचवलं. मग मी मित्राकडे पाहिलं. तो पान चघळत निवांत बसला होता. वहिनींच्या चेहऱ्यावरही फारशी चिंता दिसली नाही. मला वाटलं हे बहुदा नेहमीचंच असावं म्हणून ते दोघे निश्चिन्त बसलेत. समोरून भांडणाचा आवाज येतंच होता. बहुदा नवरा बायकोचं भांडण असावं असं एकूण जे कानावर पडत होतं त्यावरून मी अंदाज बांधला.

          पूर्वीच्या चाळींतल्या भांडणात जसा भांडणातला शब्द न शब्द ऐकू यायचा आणि भांडणाऱ्यांनासुद्धा लाइव्ह ऑडियन्स मिळायचा तसा आजकालच्या फ्लॅट संस्कृतीत ऐकू येत नसला तरी काहीतरी भांडण चालू आहे याचा अंदाज येतो. बऱ्याचदा तेव्हाच कळतं कि शेजारी कोणीतरी राहतं! तर या शेजारी दांपत्याचा उच्च रवातील संवाद लांबत गेला तसा मी दबक्या आवाजात (जणू आमचं बोलणं शेजाऱ्यांना ऐकू जाणार होतं या भीतीने) मित्राला विचारलं "अरे, हे काय?" तो शांतपणे म्हणाला "नवविवाहीत आहेत, नुकतेच शिफ्ट झालेत. लक्ष देऊ नको. शांत होईल आवाज थोड्या वेळात." मी स्मितहास्य केलं आणि गप्प बसलो. बायकोकडे पाहात नव्हतो कारण ती मला "चल निघू या आता" असं खुणावेल याची मला खात्री होती आणि मला ते नको होतं. आमच्यात शांतता पसरलेली पाहून वाहिनी म्हणाल्या "अहो काही टेन्शन घेऊ नका, बखेडाकाका येतीलच इतक्यात". हे आमच्यासाठी काहीतरी नवीनच होतं. मी आणि बायको प्रश्नार्थक मुद्रेने एकमेकांकडे बघत होतो. आमची नेत्रपल्लवी चालू असताना समोरच्या घराची बेल वाजल्यासारखी वाटली. थोडावेळ गंभीर शांतता पसरली. मित्र आता जांभया देत होता. वाहिनी स्वयंपाकघरात काही आवरायचे राहीले आहे का ते बघण्यासाठी गेल्या. आता मात्र आम्ही निघायला हवं होतं. पण 'बखेडाकाका' हे काय प्रकरण आहे हे जाणून घ्यायची मला उत्सुकता होती.

          बायकोने मला खुणावलं "चल निघू या". जरा अनिच्छेनेच मीही उठलो. उठता उठता मी मित्राला विचारलं, "अरे वहिनी मघाशी कुणा बखेडाकाकांबद्दल बोलल्या. हे कोण काका?" मित्राने जांभई आवरण्यासाठी डावा हात तोंडावर आणि उजवा हात दोन तीनदा गोल फिरवला. मला वाटलं तो मला निघायला सांगतो आहे. मी आणि बायको हसत हसत दाराकडे निघालो. आम्ही जरा खजील झालो. वाटलं अरे आपण मैत्रीचा थोडा गैरफायदा घेतला कि काय. बिचाऱ्याची रविवारची दुपारची झोप लांबवली. ती लांब जांभई संपल्यावर मित्र म्हणाला "अरे कुठे निघालात दोघं? मी म्हणत होतो आत जरा पडू. गप्पा मारता मारता सांगतो काकांबद्दल." ते शब्द माझ्या कानावर पडले आणि घामेजलेल्या चेहऱ्यावर थंड वाऱ्याची झुळूक आल्यावर जसे वाटते तसे वाटले. मला मनातून प्रचंड आनंद झाला होता आणि आता मित्राची खोली आणि त्यातील बेड दिसू लागली होती. पण इच्छा असूनही मी काही उड्या मारून आनंद व्यक्त करू शकत नव्हतो. मी म्हणालो  "अरे कशाला? राहू दे. येऊ पुन्हा केव्हा तरी." अशा वेळी बायका चाणाक्षपणे नवऱ्याच्या मनातलं कसं काय ओळखू शकतात हे कोडं मला अजून सुटलेलं नाही कारण बायकोने त्रासिक नजरेने मान हलवली आणि मनात म्हणाली असावी "याचं अवघड आहे". मित्राने वहिनींना आवाज देऊन सांगितलं "अगं, आम्ही जरा या खोलीत पडून गप्पा मारतोय. तु आणि वहिनी पण पडा." आम्ही पुन्हा एकदा ते टाळण्याचा क्षीण प्रयत्न केला पण माझ्या मनात मित्राने काय म्हणावं असा थोड्या वेळापूर्वी जो विचार आला होता त्यातील वाक्य वहिनींनी पूर्ण केली आणि मग काय आमच्या थांबण्यावर शिक्कामोर्तबच झाला. मग मी बायकोकडे न पाहताच मित्रासोबत साळसूदपणे खोलीत गेलो. तेवढ्यात समोरच्या घराच्या दारात उभं राहून कुणीतरी कुणाला हसत हसत "बाय, सी यु" असं म्हणल्याचं कानी पडलं.

          बिछान्यावर आडवं झाल्यावर मित्राने बखेडाकाकांबद्दल सांगायला सुरुवात केली.

          "बखेडाकाका हे सेनेतील एक निवृत्त अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी इथेच स्थायिक व्हायचं ठरवलं. ते इथे एकटेच राहतात. त्यांच्या पत्नीचं निधन दोन वर्षांपूर्वी झालं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी पण दोघेही US मध्ये स्थायिक झालेत. बखेडाकाका कट्टर देशभक्त असल्याने आणि उरलेल्या आयुष्यात तिथे कशाला जायचं हा विचार मनात असल्याने त्यांची काही तिकडे जायची इच्छा होत नाही. म्हणून मुलांनीही मग त्यांना बोलावणं सोडून दिलंय. दिवाळी किंवा न्यू इयरला दोघेही येतात त्यांना भेटायला. पत्नीच्या स्वर्गवासानंतर काका काही दिवस सतत कसल्याशा विचारांत असायचे. बहुदा उरलेलं आयुष्य आता कसं व्यतीत करावं याचा विचार त्यांच्या डोक्यात घोळत असावा.

          एक दिवस असेच विचारमग्न बसलेले असताना त्यांना त्यांच्या शेजारच्या घरातून चढ्या आवाजात भांडणाचा आवाज आला. बराच वेळ कुणीतरी भांडत होतं. त्यांनी विचार केला दारं खिडक्या बंद करावीत आणि झोपावं. पण ते जागेवरून उठले आणि त्यांच्या डोक्यात एक वेगळाच विचार आला. बहुदा त्यांचं सैनिकी डोकं जागं झालं असावं. ते स्वयंपाकघरात गेले, फ्रिज उघडून त्यात ठेवलेले दोन चॉकलेटचे बार काढले. त्यांना लहान मुलं खूप आवडत असल्याने त्यांच्या घरी कुणी लहान मूल आलंच तर त्याला देण्यासाठी म्हणून ते कायम फ्रिजमध्ये चॉकलेट बार ठेवत असत. ते घेऊन ते ज्या घरातून भांडणाचा आवाज येत होता त्या घरासमोर गेले आणि तिथली बेल वाजवली. अर्थातच बेल ऐकून भांडण थांबलं. घरातल्या पुरुषाने दार उघडलं. समोर काकांना पाहून त्याचा चेहरा थोडा त्रासला. पण ते वयस्कर आहेत, शेजारी आहेत, एकटेच राहतात हे बहुदा त्याला माहिती होतं. म्हणून मग त्याने त्यांना आत घेतलं."

          "त्या माणसाने जरा त्राग्यानेच विचारलं, "क्या चाहिए अंकल?" काका सरदारजी असल्याने त्यांच्याशी सगळे हिंदीतच बोलतात. काकांनी त्याला भांडणाऱ्या स्त्रीला बोलवायला सांगितलं. ती बहुतेक त्याची बायको होती." माझ्या मित्राने मधेच एक जांभई दिली. मला वाटलं आता हा झोपणार. पण काकांची गोष्ट रंजक असल्याने मी मधेच दुष्टपणे विचारलं "पुढे काय झालं?" त्याला झोप लागू नये हा माझा दुष्ट हेतु त्याला बहुदा कळला नसावा कारण त्याने उठून फॅनचा वेग थोडा वाढवला आणि पुढे सांगायला सुरुवात केली.

          "आता काका आणि ते भांडणारे नवरा बायको एकमेकांच्या समोरासमोर. क्षणभर कोणी कोणाशी बोललं नाही. पण मग काका नवऱ्याच्या दिशेने पुढे सरकले आणि त्याला स्वतःकडे खेचून मीठी मारत म्हणाले "सॉरी पुत्तर सॉरी. माफ कर देना मुझे" नवरा पेचात पडला. त्याला कळेना काय चाललंय काकांचं ते. "ओके अंकल ठीक हैं। लेकिन बात क्या हैं?" त्यानंतर काका त्याच्या बायकोकडे वळले आणि तिच्याही बाबतीत तेच केलं. तिलाही वडीलकीच्या नात्याने जवळ घेऊन तिची माफी मागितली. आता मात्र दोघांनाही प्रश्न पडला. काय घडतंय ते काही केल्या कळेना. दोघांचीही माफी मागून झाल्यावर मग काका थोडे मागे सरले. एव्हाना घडत असलेल्या प्रकाराने त्या दांपत्याला ते थोड्या वेळापूर्वी भांडत होते याचा थोडा विसर पडला होता. दोघांचंही लक्ष आता काकांकडेच होतं. मग काका म्हणाले, "मैंने सॉरी क्यू कहा ये जानना हैं तो पहले एक दुसरे को गले लगाकर सॉरी बोलना पडेगा". असं म्हणल्यावर त्या दोघांना पुन्हा भांडणाची जाणीव झाली. पण काका समोर असल्याने एक दुसऱ्याला सॉरी म्हणण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. शेवटी दोघंही कसंबसं सॉरी म्हणले एकमेकांना. मग काकांनी त्या दोघांनाही चॉकलेटं दिली. आता हे जरा बालीशपणाचं होतं पण घडत असलेले प्रसंगच असे होते कि ते गारुड्याच्या पुंगीवर डोलणाऱ्या सापासारखे काका जे सांगतील ते ऐकत होते आणि तसंच करत होते.

          काका त्या दोघांकडे बघून छानसं हसले आणि निघू लागले. पण तेवढ्यात त्या नवऱ्याने त्यांना अडवलं आणि म्हणाला "चॉकलेट के लिये थँक्स अंकल लेकिन आपने बताया नहीं आपने सॉरी क्यु बोला!" काका वळले आणि त्याला म्हणाले "उसके लिये मुझे थोडा बैठ के बताना पडेगा। टाइम हैं?" आता त्या नवरा बायकोच्या डोक्यातून भांडणाचा विषय बाजूला राहिला होता आणि काका काय सांगतात याची उत्सुकता वाढली होती.

          "देखो बेटा झगडा होता हैं और बढता जाता हैं क्यूँ कि दोनो को लगता हैं सामनेवाले कि गलती हैं। दोनों में से जो भी पहले सॉरी बोलेगा वो हारेगा। असल में हार जीत तो किसी कि नहीं होती। जितता हैं वो गुस्सा और हारतें हैं वो हिंमत और विश्वास। इन्सान तो पीछे रह जाते हैं, आगे तो उनकी निगेटिव्ह फ़िलींग्स जाती हैं। मतलब इन्सानियत हार जाती हैं। मुझे ये अच्छा नहीं लगता। जो मैंने किया वो आप दोनों भी कर सकते थे लेकिन जब दिमाग गरम होता हैं तो इन्सान को कुछ अच्छा नही सुंझता। इसलिये मैंने आके आप दोनों के अंदर बसे हुए इन्सान को जगाया और उसकी आवाज सॉरी बोलकर बाहर आयी। सॉरी तो असल में आप दोनोनें एक दुसरे को बोला हैं।

          बेटा आर्मी से हूँ। मौत को बडे करीब से देखा हैं। हम रोज जीते हैं मतलब रोज मौत को हरातें हैं। लेकिन एक दिन ऐसा आता हैं जब मौत जीत जाती हैं। तब कुछ नही कर सकते। ना किसी को सॉरी बोल सकते हो ना किसी को थँक यु। एक बात कभी नही भूलना कि मौत कि जीत का दिन कल का भी हो सकता हैं और आज का भी।" नवरा आणि बायको स्तिमित होऊन काकांकडे बघतच राहिले आणि त्यांना त्यांची चूक कळली. किती क्षुल्लक कारणावरून ते भांडत होते हे त्यांना पटलं. मलाही काकांचं ते तत्वज्ञान भावलं आणि मित्राने हिंदीत केलेलं वर्णन ऐकताना एखादा हिंदी चित्रपट पाहिल्यासारखं वाटून गेलं.

          "अरे पण काका हे सगळं तिथे बोलले हे तुला कसं माहिती?" माझा एक अनावश्यक प्रश्न.

          मित्राने सांगितलं कि त्या प्रसंगानंतर काकांचं जणू आता एकच ध्येय आहे ते म्हणजे या सोसायटीत भांडणं, तंटे, बखेडे होऊ द्यायचे नाहीत. आणि त्यांच्या या प्रयत्नात ते कमालीचे यशस्वी झालेत. बखेडा कोणाचाही असो, बाप - मुलगा, नवरा - बायको, भाऊ - भाऊ, जावा - जावा, सासू - सून अगदी कोणाचाही. काका तिथे पोचणार, साधारण त्याच पद्धतीने तो बखेडा मिटवणार आणि सलोखा निर्माण करणार. ज्या घरात भांडण सुरु असतं त्या घराचे शेजारीच आता काकांना मध्यस्थी करण्याची विनंती करतात आणि काका आनंदाने ती स्वीकारतात. त्यांच्या या अनोख्या प्रयत्नांमुळेच त्यांना आता सगळेजण 'बखेडाकाकाच' म्हणतात. खरंतर ते मेजर जनरल सिंग आहेत. एकदा ते त्याचं आणि वहिनींचं भांडण मिटवायलाही आले होते हे त्याने शेवटी सांगितलं. काकांच्या भांडण मिटवण्याचा पद्धतीबद्दल मित्राला इथंभूत माहिती कशी काय ते त्यामुळे कळलं. गप्पा मारता मारता चहाची वेळ कधी झाली ते कळलंच नाही. वहिनींनी मित्राला चहा झाल्याचा आवाज दिला आणि आम्ही परत बाहेरच्या खोलीत येऊन बसलो.

          आता माझ्या मनात बखेडाकाकांच्या कुतुहलाची जागा त्यांच्याबद्दलच्या आदराने आणि कौतुकाने घेतली होती. आम्ही चहा घेतला आणि आता मात्र निघालो. मित्राच्या प्रेमपूर्वक आदरातिथ्याचे आभार मानले आणि त्याचा निरोप घेतला. तो आणि वाहिनी आम्हाला सोडायला म्हणून खाली पार्किंग पर्यंत आले. गाडीत बसणार तोच मित्राचा आवाज कानावर पडला "गुड इव्हिनिंग अंकल। कैसे हैं आप?" समोरून साधारण सत्तरीतले एक सरदारजी येत होते. उंचेपुरे, भारदस्त शरीरयष्टी, झुपकेदार दाढी मिशा पण डोळ्यात तेवढीच प्रेमळ आणि तरल भावना. एक कमालीची विनम्रता त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात दिसत होती. त्यांनी मनापासून मित्राच्या अभिवंदनाचा स्वीकार केला आणि हसले. मित्राने ओळख करून दिली "अरे, हे बखेडाकाका ज्यांच्याबद्दल मी तुला सांगितलं ते." क्षणभर मी स्तब्ध झालो काय बोलावे ते सुचेना. एखादी आरती म्हणावी आणि ती संपल्यावर साक्षात देव समोर प्रकट व्हावा अशी भावना मनात आली. पण मी स्वतःला सावरलं आणि त्यांनी हस्तांदोलनासाठी पुढे केलेला हात हातात घेतला. त्यांचं ते कडक हस्तांदोलन आजही माझ्या लक्षात आहे. हस्तांदोलन करून त्यांनी एक छोटीशी मीठीही मला मारली. तेव्हा कळलं त्या मीठीतली उबही भांडणं मिटवायला बऱ्याच अंशी कारणीभूत ठरत असावी. का कोण जाणे पण मला त्यांच्या पाया पडावंसं वाटलं. मी त्यांचे चरण धरले आणि त्यांनीही छान आशीर्वाद दिला "जीता रह पुत्तर". एरवी टीव्ही, सिनेमाच्या माध्यमातून अगदी सर्वसामान्यपणे आपल्या कानावर पडणाऱ्या या शब्दांचा काही वेगळाच अर्थ मला तेव्हा कळला.

          परतीच्या वाटेवर बायको बोलत होती. पण माझं मन बखेडाकाकांच्यातच अजून गुंतलेलं होतं. मी आपलं बायकोच्या बोलण्यावर नुसतं "हं हं" करत होतो. बखेडाकाकांचं व्यक्तिमत्व, तत्वज्ञान, तंटे मिटवण्याची आणि सलोखा वाढवण्याची कळकळ हे सगळंच किती जगावेगळं होतं. वाटलं असे बखेडाकाका प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक सोसायटीत, प्रत्येक गल्लीत असते तर किती बरं झालं असतं. त्यांना न कसली गुर्मी ना कुठचा अहंभाव. आयुष्यभर देशरक्षण केलेला माणूस आज माणसातल्या माणुसकीचं रक्षण करतो आहे. भांडण, मारामाऱ्या, युद्ध हे सगळं मिथ्या आणि क्षणिक आहे याची पुरेपूर जाण त्यांना झाली आहे. काही बखेडे सोडवताना त्यांच्याशी कुणी उद्दामपणेही बोललं असेल, "आमच्या वैयक्तिक आयुष्यात लक्ष घालू नका" असंही म्हणलं असेल. पण ज्याच्यातील गर्वाला प्रेमाने जिंकलं आहे अशा त्या माणसाला तसं म्हणणाऱ्याची करुणाच वाटली असेल. आणि त्यांनी अधिक प्रेमाने त्याला आपलंसं केलं असेल. म्हणूनच ते त्यांच्या या कार्यात कमालीचे यशस्वी झाले असणार.

          शेवटी कुणाकडून तरी दुखावल्या गेलेल्या माणसाला काय हवं असतं हो. त्याला त्या व्यक्तीने स्वीकारावं, जवळ करून मायेचा स्पर्श करावा आणि विनम्रपणे सॉरी म्हणावं. काकांनी नेमकं हेच जाणलं होतं आणि ते सगळ्यांना आनंदी ठेवू शकत होते. त्यांची पद्धत जरी थोडीशी विचित्र वाटत असली तरी परिणामकारक होती. भलेही ती सभ्यासभ्यतेच्या धूसर सीमारेषेवरची असेल पण निर्माण झालेला ताणतणाव सोडवण्याची ताकद तिच्यात होती. आपण लहानपणी मित्रांशी, भावंडांशी भांडतो पण लगेच विसरतोही आणि पुन्हा खेळायला लागतो. काकांचं चॉकलेट देणं कदाचित त्या लहानपणाचीच आठवण करून देण्यासाठी असावं.

          मी कुठेतरी ऐकलं होतं कि कुठल्याशा अरब देशात म्हणे जेव्हा रस्त्यावर गाड्यांचा अपघात होतो तेव्हा दोन्ही गाड्यांचे चालक गाडीतून उतरतात, हस्तांदोलन करतात, एकमेकांना सॉरी म्हणतात आणि आपापल्या मार्गाने चक्क निघून जातात. किती छान पद्धत आहे ही. तत्परतेने माफी मागायची आणि दुसऱ्यानेही लगेच माफ करायचं. भांडण तंट्याचा प्रश्नच नाही आणि रस्त्यावरील इतरांनाही कसलाच त्रास नाही. आपल्याकडील अशा प्रसंगांत काय होतं हे न वर्णिलेलंच बरं. परवा तर टीव्हीवरच्या कुठल्याशा बातमीत पाहिलं कि एक दुचाकी आणि रिक्षा समोरासमोर आल्या आणि आधी कोण जाणार यावरून दोन्ही चालकांची डोकी इतकी भडकली कि गोष्ट हाणामारीपर्यंत गेली. शेवटी एकाला हॉस्पिटलमध्ये पोचवलं पण त्याचा तिथे मृत्यु झाला! हे किती भयंकर आहे. असंच मागे एकदा वाचनात आलं होतं कि कुठल्याशा ढाब्यावर जेवण नीट नाही दिलं म्हणून त्या माणसाने वेटरचा खूनच केला. बाप रे!

          बाहेरचंच कशाला घेऊन बसलात. प्रत्येकाने आपापल्या घरात जरी डोकावून पाहिलं तरी लक्षात येईल कि कधी कधी आपल्या भांडणांची आणि तंट्यांची किती छोटी आणि क्षुल्लक कारणं असतात. पण काही घरांमध्ये आपण त्या क्षुल्लक गोष्टीही कायमच्या दुराव्याला किंवा अबोल्याला कारणीभूत होत असलेल्या आपण पाहतो. हे खूपच विदारक सत्य आहे. वादविवाद हे व्हावेत पण त्यातून काही विधायक घडणार असेल तर.

          अशा बातम्या आजूबाजूला असताना बखेडाकाकांसारखी माणसं अगदी देवासमान भासतात. मी तर म्हणेन बखेडाकाकांसारखी माणसं जरी प्रत्येक ठिकाणी नसली तरी आपण हे विसरता कामा नये कि आपल्या प्रत्येकातच एक बखेडाकाका असतात. पण खूपच कमी वेळा किंवा अगदी नाहीच म्हणलं तरी चालेल आपण त्यांना जागृत करतो किंवा त्यांची आठवण आपल्याला होते. हि विचार करण्यासारखी गोष्ट नाही का? कुठल्याही भाषेत अगदी छोट्याशा शब्दाने माफी मागता येते. म्हणजे बघा ना मराठीत "माफ करा", हिंदीत "माफ किजियें", इंग्रजीत "सॉरी". किती लहान लहान शब्द पण जीभेला ते जड का वाटतात? चर्चेचा रोख भांडणांकडे वळतो आहे असं वाटलं कि लगेचच आपण का माफी मागत नाही? मला आवडलेली पद्धत म्हणजे मी वर नमूद केलेली अरब देशातील प्रथा. संभाषणाची सुरूवातच "सॉरी" म्हणून करायची आणि दुसऱ्यानेही त्याला लगेच माफ करून टाकायचं. भांडण तंटा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

          हे विचार डोक्यात घोळत असताना आणि बायकोला नुसतं "हं हं" उत्तर देता देता घरापाशी केव्हा पोचलो ते कळलंच नाही. एव्हाना बायकोच्या लक्षात आलं होतं कि मी कुठल्याशा विचारत मग्न आहे आणि तिने पूर्ण रस्ताभर काय बडबड केली हे मला काहीही कळलेलं नाही. दुपारच्या वेळी एक तर माझ्या मित्राकडे थांबावं लागल्याने ती वैतागलेली होती. गाडीतून उतरता उतरता तिची रागावून पुटपुट चालू झालीच होती. एरवीचा मी असतो तर मी कसा बरोबर आहे आणि तिने कसं समजून घ्यायला हवं याबद्दल तिच्याशी वाद घातला असता. पण तसं न करता गाडीत असलेलं एक चॉकलेट मी काढलं, तिच्या खांद्यावर हात टाकला, तिला थोडंसं जवळ केलं आणि "सॉरी" म्हणून तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं. हातातलं चॉकलेट तिला दिलं आणि छानसं स्मितहास्य केलं. माझ्यातले बखेडाकाका आता मला सापडले होते. तुमच्यातील बखेडाकाका तुम्हांला सापडलेत का?

No comments:

Post a Comment