Sunday 21 January 2024

क्या कभी हमको समझे है राम?

कहते है
जब गाये कोयल तो उसके गीतों मे होते है राम
खेतों मे जब उगे फसल तो उस में होते है राम
सुखी धरती पर गगन से बरसते पानी में होते है राम
पंछी को घौसला बनाने कि हिंमत देनेवाले होते है राम।

नन्हीसी चीटी के श्रम में है राम
थके हारे को शीतल छाया देनेवाले वृक्ष में भी राम
तितली की सुंदरता में राम
झील झरनों में बहते शुद्ध जल जैसे है राम।

अंधेरे में टीमटीमाती ज्योत जैसे है राम
ठोकरे खानेवालों का हौसला है राम
सुखी डाल पर जब पत्तीयाँ खिले तो उन में होते है राम
दुर्बल की जो ढाल बने वे होते है राम।

जटायु के बलिदान को पूजनेवाले है राम
बिछडों का जो हाथ लेते है थाम
जो ना खरीदा जा सके दे कर कोई दाम
आदर्शों का जो है सर्वश्रेष्ठ धाम
मृत्यु के परे जिसका सत्य होता है नाम।

पापीयों का विनाश करते राम
फूलों की माला के धागा है राम
शीला बनी अहिल्या को भी जो जीवन दे वे है राम
भयभीत जो, उसकी ताकत है राम
मर्यादापुरुषोत्तम मनुष्य का साक्षात्कार है राम।

यदि समझना है हमको राम
काफी नही है केवल जपना राम-नाम
भीतर के रावणदहन का करना होगा काम
वायुपुत्र स्वयं देंगे बल अगर समझना है राम
जीने का मंत्र देने जो आये थे शाम
वे दुजे ना थे कोई वे तो थे खुद ही प्रभु श्रीराम।

जय श्रीराम! जय श्रीराम!! जय श्रीराम!!!

Sunday 14 August 2022

The Toilet Hierarchy

        


कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यालयांत आणि कंपन्यांमध्ये माझं फिरणं होतं. नुकतंच असंच एका कार्यालयात जाणं झालं. ज्यांना भेटायचं होतं त्यांच्याशी छान चर्चा झाली. निघताना मला toilet वापरायचे होते म्हणून त्यांना त्याबाबत विचारले. त्यांनी "इकडून बाहेर पडून डावीकडे" असे सांगून दिशादर्शन केले. त्यांनी सांगितल्यानुसार मी तिथे गेलो. तिथे गेल्यावर मला दोन दारं दिसली. एकावर लिहिले होते "Staff" आणि दुसऱ्यावर "Director". मी काही त्या कंपनीचा Director नव्हतो म्हणून मी आपलं "Staff" अशी पाटी असलेली दार ढकललं आणि आत गेलो. 


                बाहेर आल्यावर त्यांचे वेळ दिल्याबद्दल आभार मानून तिथून निघालो. तिथून निघालो खरा पण मनात ती दोन दारं रुंजी घालत होती. अनेक प्रश्न मनात उठत होते. 


कंपनीचे मालक आणि कर्मचारी यांच्यासाठी दोन वेगळी शौचालये का असतील?


दोघंही आत जाऊन नैसर्गिक क्रियाच करतात मग हा भेदभाव का?


कंपनीचे मालक आत जाऊन काही वेगळं करतात का?


एखाद्या तरूण नवीन कर्मचाऱ्याच्या मनात अशाच गोष्टींमुळे न्यूनगंड निर्माण होत असेल का?


मालकाने अशा कर्मचाऱ्याकडून आत्मविश्वासपूर्ण कामाची अपेक्षा करावी का?


                मला जे माहिती आहे त्यानुसार नियम असं सांगतो की स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी शौचालये वेगळी असावीत. पण हे काहीतरी वेगळंच होतं. हे मी काही प्रथमतः पाहत होतो असं नव्हतं. आधीही मी बऱ्याच कार्यालयांत किंवा कारखान्यांत असा भेदभाव पाहिला आहे. इतकंच नाही तर मालकासाठी असलेले शौचालय हे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शौचालयापेक्षा अधिक स्वच्छ असतं असंही पाहिलं आहे. 


                  कर्मचाऱ्यांनी आदर करावा, आपलं ऐकावं, सांगितलेली कामं मन लावून करावीत या मालकाच्या अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. पण अशा छोट्या आणि साध्या गोष्टींमध्ये भेदभाव का असावा? जे कर्मचारी तुमच्यासाठी, तुमच्या कंपनीसाठी मेहनत करतात त्यांची काळजी घेणे हे मालकाचे कर्तव्य नव्हे का? जसं कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल, जबाबदऱ्यांबद्दल समजावलं जातं तसं मालकाने पण कर्मचाऱ्यांना समजावून घेऊन काम करणं अपेक्षित असतं.


                  हा भेदभाव, ही वर्तणूक कंपनीच्या भल्यासाठी आहे का याचा विचार मालकांनी नेहमीच करायला हवा. असा भेदभाव करून केवळ मालकाचा ego सुखावला जातो पण त्याचवेळी तो कर्मचाऱ्यांच्या मनावर रोज नकळत आघात करत असतो. अशी कंपनी कशी यशस्वी होणार? अशा गोष्टींमधूनच कंपनीचे culture कळते. एकीकडे आपण वाचतो की मोठमोठे उद्योगपती त्यांना महागडे तिकीट खरेदी करून विमान प्रवास करणे सहज शक्य असूनदेखील economy class ने प्रवास करतात. आणि त्याचवेळी काही मालक छोट्या छोट्या गोष्टींत भेदभाव करताना दिसतात. हा विरोधाभास मन विचलित करणारा आहे. अशाच विचारांमुळे काही कंपन्यांची वृद्धी होत नसेल का? अशा कोत्या विचारांमुळेच तो मालक कधीच मोठा होत नसेल का?


                   बऱ्याच भारतीय कंपन्यांमध्ये, कार्यालयांमध्ये आता सुधारणा होताना दिसत आहे. पण आपल्याला जी प्रगती अपेक्षित आहे ती होते आहे का हे बघणे महत्वाचे ठरेल. अशा साध्या गोष्टींमध्ये जर भेदभाव होत असेल तर आपण अजूनही मागसलेलेच आहोत असंच म्हणायला हवं. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. पण हे खरे स्वातंत्र्य आहे का? अजूनही आपण भेदभावाच्या विचारांचेच गुलाम आहोत. मला वाटतं, जेव्हा समाजातील हे विचार जेव्हा नष्ट होतील तेव्हा आपण खरा महोत्सव साजरा करण्यास पात्र ठरू. शेवटी Virgin कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या रिचर्ड ब्रँसन यांचं एकच वाक्य आठवतं "If you take care of your employees, your employees will take care of your business."


Photo by Claudio Schwarz on Unsplash

Sunday 9 May 2021

प्रतिकूल परिस्थिती आणि आशावाद

काही दिवसांपूर्वीच जेफ केलर नावाच्या एका अमेरिकन लेखक आणि वक्त्याचा एक किस्सा वाचनात आला. किस्सा तसा छोटाच आहे पण त्याने त्यातून घेतलेली शिकवण विचार करण्यासारखी नव्हे आत्मसात करण्यासारखी आहे. 

जेफला स्वतःचे शूज स्वतः चमकवायला (पॉलिश करायला) आवडायचं नाही. तो ते नेहमी बाहेरून करून घ्यायचा. जेव्हा तो फिरतीवर असे तेव्हा जिथे कुठे शूज पॉलिशची सोय असेल तिथे तो ते पॉलिश करून घ्यायचा. पण जेव्हा तो त्याच्या राहत्या गावी असे तेव्हा मात्र त्याला त्याच्या घरापासून दूर जवळपास १२ मैलावर असलेल्या एका मॉलमध्ये जावं लागायचं. तिथे एक दुकान होतं जिथे पॉलिशिंगची सोय होती. मग तो त्या दुकानात काही गोष्टी खरेदी करत असे आणि तिथे असलेल्या पॉलिश स्टँडवर शूज चमकवून घेत असे. घरापासून हे असं दूर जावं लागत असल्याने तो जाताना बरेच जोड घेवून जात असे. 

सहसा ते दुकान सकाळी १०.३० ला उघडत असे. एक दिवस तो असाच पावणेअकराच्या सुमारास तिथे पोहोचला. दुकान उघडलेलं होतं पण शूज पॉलिश स्टँड अजून बंदच होता. त्याने तिथे काम करणार्‍या एकाला ते स्टँड कधी सुरू होईल हे विचारलं. त्या माणसाने जेफला १० मिनिटं थांबायला सांगितलं. १० मिनिटं होवून गेली तरी तिथे कोणीच आलं नाही हे पाहून त्याने पुन्हा विचारणा केली. त्या माणसाने त्याला सांगितलं की अगदी मिनिटभरातच ते स्टँड सुरू होईल. १०-१५ मिनिटं झाली तरी ते स्टँड सुरू व्हायची काही चिन्हं दिसेनात. मग सरळ तो त्या दुकानाच्या मॅनेजरकडे गेला आणि चौकशी केली. मॅनेजर म्हणाला, "माफ करा तुमची गैरसोय झाली पण आज त्या स्टँडवरचा माणूस सुट्टीवर आहे." असं म्हणून तो निघून गेला. 

आता मात्र जेफ वैतागला. त्या क्षणी त्याच्या डोक्यात विचार आला कि या सगळ्यांची तक्रार नोंदवावी, अगदी कोर्टात केस करावी. पण स्वतःला सावरलं आणि तिथून निघाला. घरच्या जवळ पोहोचत असताना त्याला सुचलं कि वाटेत असलेल्या एका शूजच्या दुकानात चौकशी करावी. कुणी सांगावं कदाचित शूज पॉलिश करून मिळतीलही. दुकानात जावून चौकशी केल्यावर त्याला कळलं कि त्या दुकानात पॉलिशिंगची सोय नाही पण तिथून पुढे काही अंतरावर एक दुकान आहे जिथे त्याचं काम होवू शकेल. 

मग त्याने तिथे जायचं ठरवलं. तिथे जावून बघतो तर काय, "५ मिनिटांत परत येतो आहे" अशी पाटी दुकानावर लावलेली! आता मात्र त्याचा धीर सुटत चालला होता. पण तरीही त्याने थांबायचं ठरवलं. तब्बल १० मिनिटांनी त्या दुकानातला माणूस आला. जेफने त्याला काय हवे आहे ते सांगितलं. त्या माणसाने जेफला शूज ठेवून जा आणि एक  तासाभराने या असं सांगितलं. 

एक तासाने जेव्हा जेफ तिथे गेला तेव्हा त्याला जाणवलं कि त्याचे शूज नुसते चमकतच नव्हते तर चांगले झळाळत होते! त्याने दाखवलेल्या धीराचे फळ त्याला मिळाले होते. 

दुसरा एक प्रसंग वाचनात आला तो आहे हार्वर्ड विद्यापीठातला. प्रसंग नव्हे तो एक प्रयोगच होता. डॉ. कर्ट रिष्टर या शास्त्रज्ञाने काही उंदरांवर १९५० च्या दशकात एक प्रयोग केला होता. त्याने काय केलं तर उंदरांना पाण्याच्या एका कृत्रिम तळ्यात सोडलं. त्याला हे अभ्यासायचं होतं कि ते उंदीर पाण्यात किती वेळ तग धरू शकतात. त्याच्या असं लक्षात आलं कि जिवंत राहण्यासाठी साधारणतः ते १५ मिनिटं प्रयत्न करतात. प्रयोग करताना उंदीर जेव्हा थकून जावून प्रयत्न करणं सोडायचे तेव्हा शास्त्रज्ञ त्यांना उचलायचे, त्यांचे अंग कोरडे करायचे, त्यांना थोडा वेळ विश्रांती घेऊ द्यायचे आणि पुन्हा पाण्यात सोडायचे. 

या दुसर्‍या फेरीत ते उंदीर किती वेळ तग धरून राहिले असतील असं तुम्हाला वाटतं? पुन्हा १५ मिनिटं? १० मिनिटं? ५ मिनिटं? विश्वास बसणार नाही पण तब्बल ६० तास! हो, हो, बरोबर वाचलंत...६० तास! शास्त्रज्ञांनी या प्रयोगातून असा निष्कर्ष काढला कि आपली यातून सुटका होईल केवळ या विश्वासामुळे त्या उंदरांनी केवळ अशक्य वाटणारे असे जलतरण केले. निव्वळ सकारात्मक आशा बाळगून जर उंदीर इतक्या वेळ पोहू शकतात तर तोच सकारात्मक आशावाद आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना कुठल्याही कठीण परिस्थितीतून नक्कीच तारून नेऊ शकेल. स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतांवर दृढ विश्वास ठेवला तर कुठलेच संकट माणसासाठी मोठे नाही. 

जेफच्या आयुष्यातील छोटासा प्रसंग असो किंवा उंदरांवरचा प्रयोग असो, एक गोष्ट नक्की कळते कि प्रतिकूल परिस्थिती ही कायम राहू शकत नाही. आपण योग्य ती सकारात्मक वृत्ती आणि आशावाद बाळगला तर कुठल्याही संकटाचा सामना करू शकतो. त्या जाहिरातीतील वाक्य आठवतं? "डर के आगे जीत है". कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीची सकारात्मक बाजू असतेच. सध्याचा काळ बर्‍याच जणांसाठी प्रतिकूल आहे पण त्यांनी तो तसा वाटू दिला तर. नेपोलियन हिल या प्रसिद्ध लेखकाचं एक वाक्य या क्षणाला आठवतं "कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत तिच्याएवढ्याच किंवा तिच्याहूनही अधिक अनुकूल परिस्थितीची बीजं असतात". 


Friday 24 April 2020

शांत निसर्ग का कोपला?

होऊन अनावर वरूणराज बरसला
नदी नाल्यात जणू प्रलयच आला
शुष्क पानासम माणूस वाहून गेला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?


क्रोध अनावर वनदेवीचा झाला
वणवा चहूकडे मोकाट पिसाटला
निष्प्रभ माणूस भस्म जाहला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?


रत्नाकर तो अपरिमीत खवळला
फणा काढून फुत्कारीतो वादळाला
फोलपटासम माणूस उडाला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?


हिमालय तो रागाने थरथरला
आवेगाने चित्कारत कडाडला
खड्यासम माणसास दूर सारला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?


सुचविले निसर्गाने पदोपदी माणसाला
कृत्रीम बुद्धी अन् ऐहिकात माणूस गुंगला
दाखवून भावनाशून्य प्रतीमानव ललकारीतो त्याला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?


दुर्लक्षिले माणसाने जन्मदात्या निसर्गाला
लुटले त्यास चौफेर रिझवण्या हव्यासाला
बुभुक्षित माणसाची भूक पेटली शिगेला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला?


निसर्ग उलटला माणूस आला काकुळतीला
तत्परतेेेने श्रीरंगाचा धावा केला
मीच पर्वत, मीच समुद्र, मीच अग्नी, मीच वरूण भगवंत तो वदला
उमगले अंततः ब्रम्हांडातील त्या नगण्य कणाला
शांत निसर्ग का कोपला, का कोपला

Friday 3 April 2020

कलोनाशी कट्टी


बेलूक दादा कसा झोपला आहे छान 
मिकी तल कलतो आहे पायांची कमान
आई बाबा म्हणतात बाहेल नाही जायचं
शांगा मग आम्ही कशं बलं खेलायचं?


कित्ती दिवश झाले फ्लेंडस् च नाही भेटले
चित्ल लंगवून लंगवून कलल्श पन शंपले
कधी तरी फ्लेंडस् ना व्हिलो काॅल कलतो
बोलत नाही नुशत्या उल्याच जाश्त मालतो


स्कूलला शुट्टी आणि डे केलला पन शुट्टी
शगळ्यांशी मी आता घेनाल आहे कट्टी
पला पला घलातच किती वेला खेलनाल
टिवी आनी फोन शालका किती पाहनाल


आजी मनते बाहेल कलोना लाक्शश आला आहे
मी तल त्याला आता फोनच लावनाल आहे
का गं कलोना आम्हाला अशा त्लाश देतोश
शांगू का तुझ्या आईला तू काय काय कलतोश


तू जा आनी पुन्ना कद्दी येऊ नकोश
आम्माला खेलू दे मधे मधे कलू नकोश
तुझ्याशी पन मी कट्टी घेतली आहे
पापा आनी साबनाशी गट्टी आता केली आहे


आता मी दमले, कलते थोला वेल निन्नी
तू पन तुझ्या घली जा आनी खेल तुझी खेलनी
उठल्यावर मी खानाल गोल गोल चिला
तुझी आई काय देनाल जाऊन विचाल तिला


तू जा आनी खेल तुझ्या फ्लेंडस् बलोबल
नाही तल डाॅक्तल काका देतील इंजू ढुंगुवल
मग बसशील ललत जाशील इथून पलून
हॅप्पी होईन मी पुन्हा फ्लेंडस् ना भेटून

Thursday 26 March 2020

OK ची कहाणी

फोटो सौजन्य: photosforyou from Pixabay




तुम्ही दिवसातून बोलताना किती वेळा 'OK' म्हणता याची कधी मोजदाद ठेवली आहे का? किती साधा सोपा शब्द आणि किती वेगवेगळ्या प्रसंगी आपण त्याचा वापर करतो आणि तेही विविध भावना व्यक्त करण्यासाठी. म्हणजे बघा ना, एखादा सिनेमा कंटाळवाणा असेल आणि जर कुणी विचारलं तर आपण निरूत्साही होऊन म्हणतो "OK", किंवा एखाद्या प्रसंगी कुणाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण म्हणतो "OK, तर पुढची गोष्ट आता आपण अशी करू या", किंवा एखाद्याने काही सुवार्ता दिली तर आनंदाने म्हणतो "OK मस्तच". रस्त्यांवर हमखास आपल्याला ट्रक्सच्या मागे लिहीलेलं दिसतं ते "HORN OK PLEASE". अर्थात त्यात "HORN PLEASE" आणि "OK" असे दोन शब्द असावेत असा माझा समज आहे. पण "HORN" आणि "PLEASE" या दोन शब्दांमध्ये "OK" लिहीण्याचे कारण काही कळू शकलेले नाही.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण हा शब्द २०० वर्षदेखील जुना नाही! म्हणजे लोक या शब्दाचा वापर बोलताना किंवा लिहिताना करतही नव्हते! आता कदाचित मनातल्या मनात आश्चर्याने तुम्ही "OK" म्हणालाही असाल. अमेरिकन इंग्रजी भाषेत उगम होऊन हा शब्द पुढे ब्रिटीश इंग्रजीत रूळला आणि पुढे जगातील इतर अनेक भाषांत तो रूढ झाला.

"OK" च्या जन्माच्या अनेक आख्यायिका आहेत. वेगवेगळ्या भाषांतील विविध संज्ञांचा तो अपभ्रंश आहे असं काही जणं म्हणतात तर कुणी म्हणतं कि काही बेकर्स त्यांच्या नावाचे इनिशियल्स म्हणून बिस्किटांवर "OK" छापायचे तर कुणी म्हणतं जहाज बांधणी करणारे लोक काही विशिष्ट लाकडावर "outer keel" असं लिहीण्यासाठी "OK" लिहायचे. असे एक ना अनेक तर्क वितर्क "OK" शब्दाचे मूळ शोधण्यासाठी केले गेले.

ॲलन मेटकाफ नावाच्या व्यक्तीने "OK" च्या उगमावर बरेच काम केलेले आहे. त्यांनी त्यांच्या संशोधनावर आधारित एक पुस्तकही लिहिले आहे ज्याचे नाव आहे "ओके: दि इम्प्राॅबॅबल स्टोरी ऑफ अमेरिकाज् ग्रेटेस्ट वर्ड". दोन अक्षरी शब्दाच्या उगमाची माहिती देणार्‍या पुस्तकाचे शीर्षक किती मोठे! त्यांच्या म्हणण्यानुसार बाॅस्टन माॅर्निंग पोस्ट नावाच्या एका वृत्तपत्राच्या संपादकीयात २३ मार्च १८३९ रोजी 'ॲन्टी बेल रिंगींग सोसायटी' असं विचित्र नाव असलेल्या एका संस्थेबद्दल एक विनोदी लेख छापून आला होता. त्यात लेखकाने "o.k." ही अक्षरं "all correct" हे लिहीण्यासाठी संक्षेपाने वापरली होती. "All Correct" साठी "o.k." लिहीणं ही त्या काळी काही वेगळी बाब नव्हती. आज आपण जसे OMG, LOL वगैरे संक्षेप वापरतो तसेच त्या काळी काही संक्षेप अस्तित्वात होते. म्हणजे सध्याच्या संक्षेपांचे पूर्वजच म्हणा ना. उदाहरणार्थ "i.s.b.d." (it shall be done), "r.t.b.s." (remains to be seen), "s.p." (small potatoes) इत्यादी इत्यादी. आता ते आपल्याला वाचायला विचित्र वाटतात पण त्या त्या काळातील भाषा असते. आपण आपली मराठी बोलीभाषा कशी बदलत गेली हे बघतोच की. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकात वाचलेली शिवकालीन भाषा आणि आताची भाषा. किती फरक आहे बघा ना. तुलना करायची झाली तर कालखंड साधारण तोच आहे.

खरं तर त्या काळी संक्षेप वापरण्याची एक वेगळीच गंमत होती. म्हणजे "no go" साठी k.g. (know go) आणि "all right" साठी o.w. (oll write) असे काही तरी विचित्र संक्षेप होते. त्यामुळे oll korrect साठी o.k. लिहिणं हे एकदम ओकेच होतं. आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं कि बाकी सारे संक्षेप लोप पावले पण OK तेवढा तरला. ॲलन मेटकाफच्या म्हणण्याला भक्कम पाया होता तो प्रा. ॲलन वॉकर रीड यांच्या सखोल अभ्यासाचा. कोलंबिया विद्यापीठातील या प्राध्यापक महाशयांनी अनेक वर्षं 'OK' संबंधित ऐतिहासिक पुरावे गोळा करण्यात घालवली आणि स्वतःचा शोध एका लेखमालिकेत प्रसिद्धही केला.

OK चं नशीबही जोरावर होतं. १८४० मधे निवडणूकीत एक उमेदवार होता ज्याचं नाव होतं मार्टिन वॅन बुरेन आणि त्याचं टोपणनाव होतं ओल्ड किंडरहूक (Old Kinderhook). काही ट्यूब पेटली का? या टोपणनावाची आद्याक्षरे काय आहेत बघा. त्याच्या समर्थकांनी एक क्लब स्थापन केला होता ज्याचं नाव होतं O.K. Club. मग काय? आपला "oll korrect" वाला OK या टोपण नावात केव्हा मिसळून गेला हे कोणालाच कळले नाही. विरोधी उमेदवार होता हॅरिसन. जेव्हा बुरेन गट आणि हॅरिसन गट यांमध्ये राजकीय वादविवाद व्हायचे तेव्हा OK ची सरमिसळ घोषणाबाजी आणि एकमेकांवर चिखलफेक करताना व्हायची. त्याचे वेगवेगळे अर्थ निघू लागले out of kash, out of karacter, all kwarrelling आणि बरंच काही.

साधारण १८७० च्या दशकात टेलिग्राफ चालक जे होते त्यांच्यासाठी संदेश मिळाल्याची पोचपावती देण्याचा "OK" हा खूपच प्रचलित शब्द झाला होता. तिथूनच अमेरिकेतील महान शब्द बनण्याचा त्याचा प्रवास सुरू झाला.

पण OK या शब्दाचं यश त्याचं उगमस्थान विसरण्यातच आहे. तो कुठून आला याच्या विस्मरणाने आपण सर्वांनीच त्याला आपलेसे केले आहे. आता हा शब्द संस्कृती, भाषा, देश या सर्वांच्या पलीकडे गेला आहे. वैयक्तिक संवाद असो किंवा व्यावसायिक संवाद OK चे स्थान आता जणू अढळ आहे. दोनच अक्षरी शब्द पण किती उपयोगी आहे. मला तर तो "मूर्ती लहान पण किर्ती महान" या श्रेणीतला वाटतो. काही शब्दच असे असतात कि जे बरंच काही बोलून जातात आणि ते बोलणं वक्त्यालाही कळतं आणि श्रोत्यालाही. एका पांगळ्या विनोदातून जन्मलेला हा शब्द आज अख्ख्या जगाने स्वीकारला आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला तर एकदम OK वाटतं आहे. तुम्ही कसे आहात?


संदर्भ: अरिका ओकरेंट आणि मेंटल फ्लॉस यांचा एक लेख

Sunday 22 March 2020

गुळ तूप पोळी आणि मी

गुळ तूप पोळी आणि माझं नातं अगदी लहानपणापासूनचं. जणू ती माझी बालमैत्रीणच. शाळेतल्या डब्यात आईने द्यायला सुरूवात केली आणि तिने माझ्या आयुष्यात अढळस्थानच प्राप्त केलं. आजही इतक्या वर्षांनी जेव्हा मी गुळ तूप पोळी खातो तेव्हा एक असीम आनंद मिळतो. मला खात्री आहे की आपल्यापैकी कित्येक जणांना ती अशीच मनापासून आवडत असेल.

बघायला गेलं तर किती साधा पदार्थ. अगदी कमीत कमी जिन्नस वापरून तयार करता येईल असा. म्हणजे पदार्थाच्या नावातच त्याचे जिन्नस, गुळ, तूप आणि पोळी. त्यातदेखील शिळी पोळी असेल तर ती अजूनच चवीष्ट लागते. या तीनच गोष्टी वापरून एक कंटाळा न येणारा, पोट भरू शकणारा, समाधान देणारा आणि हो आजकाल ज्याचं फार महत्त्व आहे असा पौष्टिक पदार्थ म्हणजे गुळ तूप पोळी. ज्याने किंवा जिने या पदार्थाचा शोध लावला असेल त्याचा/तिचा मी सदैव ॠणी आहे.

मी हे मान्य करतो कि मी मधुरदंती आहे. गोड खाणारा, गोड्या, गोडोबा ही मराठीतील विशेषणं न वापरता "I have a sweet tooth" याचं गोड भाषांतर करून मराठी भाषा किती गोड आहे हे सांगण्याचा हा एक प्रयत्न. असो. तर थोडक्यात काय तर मला गोड पदार्थ आवडतात. गुळ तूप पोळी आणि पारले जी ची बिस्कीटं हे माझे बालपणापासूनचे सवंगडी. त्यापैकी आधी कोणाशी मैत्री झाली हे सांगणं कठीण आहे. पण गुळ तूप पोळी अजूनही माझ्या टचमधे आहे. खरं तर पारले जी बिस्किटांवरही माझं प्रेम आहेच पण बायकोला माझी आणि त्यांची मैत्री फारशी आवडत नाही. ती हेल्थ कॉंशस वगैरे असल्यामुळे आणि मीही आहाराकडे लक्ष द्यावं असा तिचा आग्रह असल्यामुळे मी त्यांच्याशी जरा कमीच संबंध ठेवून असतो. तो माझा सवंगडी परदेशी गेला आहे असं मी समजतो. आता मी तथाकथित पौष्टिक आणि अगोड (शुगर फ्री) बिस्किटांमध्ये आमची मैत्री शोधतो. पण ते कसं आहे ना काहीजणांची मैत्री मूल्यवर्धक नसते पण तरीही हवीहवीशी वाटते तसच काहीसं माझं आणि पारले जी बिस्किटांचं झालं आहे.

तर मी गुळ तूप पोळीबद्दल सांगत होतो. ती करता आणि खातादेखील किती वेगवेगळ्या पद्धतीने येते. पोळीवर तूप पसरवून त्यावर गुळ कुसकरून मग पोळीची गुंडाळी करायची आणि एकेक घास चवीने खायचा, ताटात गुळ आणि तूप कालवायचं आणि पोळीच्या एकेका तुकड्यासोबत थोडं थोडं लावून खायचं. किंवा गुळपोळी आणि तूप. पण माझा आवडता प्रकार म्हणजे पोळी आणि गुळ बारीक कुसकरून त्यावर तूप घालून एकत्र कालवून खायची. छान मऊ लुसलुशीत असा तो पदार्थ स्वर्गीय सुख देतो. यात गुळाचं प्रमाण आणि कुसकरलेल्या पोळीचे तुकडे योग्य आकाराचे असतील तर त्या पोळीची मजाच न्यारी. याच मिश्रणाचा लाडूदेखील कधी कधी डब्यात असायचा. कदाचित सकाळच्या गडबडीत उपलब्ध असलेला वेळ पदार्थाचे स्वरूप ठरवत असावा. वेळ असेल तर लाडू नाही तर नुसतीच कालवलेली पोळी. किंवा मूड चांगला असेल तर लाडू नाही तर घरात भांडण झालं असेल तर कुसकरलेली पोळी. पण रागावून कुसकरलेली पोळी अधिक बारीक आणि गुळ आणि तुपात एकरूप होऊन गेलेली असायची हे आईला कुठे ठाऊक असायचं.

बर्‍याचदा हे मिश्रण भांड्यात परतून पण करतात. या करण्यामधे मात्र करणार्‍याचे कसब लागते. पदार्थाचा मऊसूतपणा कमी होण्याची शक्यता असते आणि ती गरमच चांगली लागते. ती कधी कडक आणि चावायला अवघड होवू शकते तर कधी जळूही शकते. या पोळीची मोठी बहीण म्हणजे भाकरी. बरेच जण भाकरीबरोबर सुद्धा गुळ आणि तूप खातात. माझ्या माहितीप्रमाणे गुजरात आणि राजस्थानमध्ये भाकरीबरोबर गुळ तूप खायची रीत आहे. पण मला आवडते ती गुळ तूप पोळीच. पसंद अपनी अपनी. काही दिवसांपूर्वी TV वर एका कार्यक्रमात पूर्वीच्या काळी जिथे फारसं काही पिकत नाही अशा राजस्थानच्या वाळवंटात लोक डेझर्ट म्हणून काय खायचे तर कणकेची पुरी लाटून त्यात गुळाचा तुकडा ठेवायचा, त्याचा गोळा तयार करून तो वाफवायचा आणि तुपाबरोबर खायचा. आहे कि नाही गुळ तूप पोळीचा अजून एक प्रकार. तिचे पूर्वज म्हणू या हवं तर. डेजर्ट मधील डेझर्ट!

हा प्रकार इतका सोपा कि अगदी स्वयंपाक येत नसणार्‍या माणसाला देखील अगदी हातखंडा असल्यासारखा पदार्थ जमू शकतो. हे मी खात्रीने सांगू शकतो कारण लहानपणी जेव्हा आईला डबा तयार करणं शक्य नसायचं तेव्हा बाबा डब्यात गुळ तूप पोळी द्यायचे. नंतर नंतर तर त्यांनी त्यात प्रावीण्यही मिळवलं होतं आणि विविधताही आणली होती. वेगळा स्वाद यावा म्हणून कधी ते बडीशेप घालायचे तर कधी वेलदोडयाची पूड तर कधी अधिक पौष्टिक करण्यासाठी दाण्याचं कूट घालायचे. माझं काम खायचंच असल्याने मी ते सगळे प्रकार चाटून पुसून फस्त करायचो. यात बाबांचं पाककौशल्य अधोरेखित करायचे नसून पदार्थ करायला किती सोपा आहे हे सांगायचे आहे याची सुज्ञ खवय्यान्नी दखल घ्यावी. 

तर अशा या गुळ तूप पोळीचा मी जसजसा अधिक विचार करतो तसतसं मला तिच्यात जीवनाचे तत्वज्ञान दिसायला लागते. म्हणजे बघा ना, गुळासारखा गोडवा, तुपासरखी शुद्धता आणि पोळीसारखी लवचिकता जर आयुष्यात असेल तर आयुष्य सुखी होणार नाही का? गणपतीच्या नैवेद्यासाठी जे कणकेचे मोदक करतो त्यातही आपल्याला गुळ तूप पोळी सापडतेच कि! पदार्थाची चव तर आहेच पण करणार्‍याची माया खाणार्‍याच्या समाधानात ज्या काही थोड्या पदार्थांमधून दिसून येते त्यापैकीच हा एक असं मला वाटतं. माझ्या मते हा एक अजरामर पदार्थ आहे. जोपर्यंत गुळ आहे, तूप आहे आणि पोळी आहे तोपर्यंत या पदार्थाला मरण नाही. शेवटी एवढंच म्हणेन कि "गूळ तूप पोळी खाओ खुद जान जाओ".